आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३चा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. १९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने असणार आहेत. अहमदाबादच्या या मैदानावर दोन्ही संघ यापूर्वी अनेक सामने खेळले आहेत. टीम इंडियाचा येथे विक्रम चांगला राहिला आहे ,पण ऑस्ट्रेलियन संघाचा येथे भारतापेक्षा चांगला विक्रम राहिला आहे. भारतीय संघाने १९८४ ते २०२३ या कालावधीत अहमदाबादच्या या मैदानावर एकूण १९ सामने खेळले आहेत. यामध्ये भारताने ११ सामने जिंकले आणि ८ सामने गमावले. म्हणजे विजयाची टक्केवारी ५७.८९ होती. घरच्या मैदानाप्रमाणे येथे भारतीय संघाची कामगिरी सरासरी राहिली, असे म्हणता येईल. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाने या मैदानावर आतापर्यंत ६ सामने खेळले आहेत, त्यापैकी ५ सामने जुन्या मोटेरा स्टेडियमवर खेळले गेले आहेत. त्यापैकी ४ सामने जिंकले आहेत आणि दोन गमावले आहेत. म्हणजेच कांगारूंची विजयाची टक्केवारी ६६.६६ इतकी आहे, जी टीम इंडियापेक्षा सरस आहे. अहमदाबादच्या या मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया याआधी तीनदा भिडले आहेत. ऑक्टोबर १९८४ मध्ये दोन्ही संघ येथे पहिल्यांदा भिडले होते. कांगारूंनी हा सामना एकतर्फी ७ गडी राखून जिंकला होता. दोनच वर्षांनंतर येथे दोन्ही संघ पुन्हा आमनेसामने आले. या सामन्यात भारतीय संघाने ५२ धावांनी विजय मिळवला. या मैदानावर दोन्ही संघांमधील शेवटचा सामना मार्च २०११ मध्ये झाला होता. तेव्हा भारतीय संघाने ५ गडी राखून विजयी झाला होता. म्हणजेच अहमदाबादच्या या मैदानावर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर हेड टू हेड सामन्यांमध्ये वर्चस्व राखले आहे. अहमदाबादमधील मोटेरा येथे असलेले हे मैदान पूर्वी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावावर होते. त्याला सरदार पटेल स्टेडियम किंवा मोटेरा स्टेडियम असे म्हणले जात होते. १९८४ मध्ये येथे प्रथमच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना खेळवण्यात आला होता. अलीकडच्या काळात या स्टेडियमला भव्य स्वरूप देण्यात आले आहे. प्रेक्षक क्षमता वाढवण्यासोबतच संपूर्ण स्टेडियमचा कायापालट करण्यात आला आहे. या नूतनीकरणानंतर या मैदानाला नरेंद्र मोदी स्टेडियम असे नाव देण्यात आले. १ लाख ३२ हजार प्रेक्षकांची क्षमता असलेले हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे.
